Tuesday, November 30, 2010

पर्गती?

धानू शिरपती,
कुठं कशाची झाली रं पर्गती?

गाडी बी तीच
गडी बी तेच
बैल बी तेच
कासरा त्योच सैल
मग बदललं ते काय?
बैलाचं पाय?

उजव्या अंगाचा भादा बैल,
डाव्या अंगाला आला
पर,
त्यानं बदल रं काय झाला?
आता बसणाराना वाटतंय
जत्रा माघारी निघाली

माझ म्हननं
ही मजलच अवघड हाय
हे वझं जीवापरीस जड हाय

गाडी बी नवी बांधाय हुवी
रस्ता बी नवा कराय होवा
ताजीतवानी खोंडं जुपली
'त' कुणाला ठावं
जाईल गाडी सरळ
पण हे कुणी करायचं?
कसं करायचं?

पयला गाडीवान म्हनायचा
जल्दी जल्दी
आताचा बी म्हनतोय
जल्दी जल्दी
वाट बदलत न्हाई
बैल हालत नाही
धानू शिरपती,
ही कसली गा क्रांती?

-ग.दि.मा.




(‘पूरिया’ या ग.दि.मां च्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे. प्रस्तावनेत शांता शेळके लिहितात:
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कॄषिकांचे, दलितांचे, सा-या हीनदीन जनतेचे भाग्य उजळून टाकण्याच्या हेतूने शासन कटिबध्द झाले. नवनव्या योजना आखल्या गेल्या. उध्दाराचे नारे उठले. पण प्रत्यक्ष हातामधे काय आले? ‘पूरिया’ मधील ‘कृषिकांचे पालुपद’, ‘पर्गती’, ‘भूमिहीन’ या कविता लक्षणीय आहेत. उपरोधपूर्ण आणि तळमळीच्या भाषेत कवी ‘धानू शिरपती’ या कृषिकाशी त्याच्याच ग्रामीण बोलीभाषेत संवाद करत आहे. हा संवाद माडगूळकरांच्या उत्कट जाणिवेचा जसा निदर्शक आहे, तसा त्यांच्या नाटयात्म चित्रदर्शी शैलीचाही सुंदर नमुना आहे. ‘पर्गती’ या कवितेत सर्व शासनावरच बैलगाडीचे रुपक कवीने केले आहे.)

1 comment: