Thursday, December 30, 2010

अम्हास प्यारी मधुबाला - वसंत बापट

मदीरा साकीसंगे जेथे
एकच होतो मधु प्याला
ती स्वर्गाहुन सुखकर म्हणती
कुणी बच्चंजी मधुशाला
नकोत असल्या व्यर्थ जल्पना
सर्व असंभव काव्यकल्पना
तुम्हास तुमची मधुशाला
अम्हास प्यारी मधुबाला

नार अनारकलीसम नाजुक
पडदा दुर जरा झाला
महाल स्वप्नांचा झगमगता
लखलखली चंद्रज्वाला
डोळे दिपता चोरी झाली
दिलदारांची ह्रदये गेली
कठोर काळा दाद न देता
फरार झाली मधुबाला

कुठे हरपली शोधीत बसला
जगात जो तो दिलवाला
स्वप्नामध्ये खळी चाचपुन
स्पर्शुन पाही कुणी गाला
अजुन तिला मन शोधीत राही
धुंडुन झाल्या दाही दिशाही
रजतपटावर कितीक झाल्या
मधुबाला ती मधुबाला

Tuesday, December 21, 2010

बा. भ. बोरकर - संधिप्रकाशात अजून जो सोने

संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी;

असावीस पास, जसा स्वप्नभास,
जीवी कासावीस झाल्यावीण;

तेंव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण त्याची नाही;

तूच ओढलेले त्यासवे दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे;

रंभागर्भी वीज सुवर्णाची कांडी
तशी तुझी मांडी देई मज;

वाळल्या ओठा दे निरोपाचे फूल:
भुलीतली भूल शेवटली;

जमल्या नेत्रांचे फिटू दे पारणे,
सर्व संतर्पणे त्यात आली.

Monday, December 20, 2010

एकनाथ पांडुरंग रेंदाळकर ऊर्फ कवी रेंदाळकर : अजुनी चालतोचि वाट

अजुनी चालतोचि वाट! माळ हा सरेना
विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना!

त्राण न देहात लेश, पाय टाकवेना,
गरगर शिर फिरत अजि होय पुरी दैना!

सुखकर संदेश अमित पोचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाणा!

काट्य़ांवरी घातलाची जीव तयासाठी,
हसवाया या केली किती आटाआटी!

हेच खास माझे घर म्हणुनी शीण केला,
उमगुनी मग चूक किती अश्रुसेक झाला;

दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली,
निकट वाटते जीवनसंध्या ही आली!

कुठुनी निघालो, कोठे जायचे न ठावे,
मार्गातच काय सकळ आयु सरुनि जावे!

काय निरुद्देश सर्व जीवन मम होते
मरुसरितेपरी अवचित झरुनि जायचे ते?

पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता,
या धुळीत दगडावर टेकलाच माथा

मे १९२० ('मासिक मनोरंजन'मध्ये प्रसिद्ध)

Wednesday, December 8, 2010

पद्मा गोळे - सकाळी उजाडता उजाडता

सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं
..... आणि कमालच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.
पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,
तर अर्ध्याअधिक विटा उचकटून फेकलेल्या !
पुन्हा माझी कारागिरी!
पुन्हा काही दिवसांनी
मध्यरात्रीच जाग आली, पाहिलं :
थडगं पूर्ण उस्कटलेलं !
आणि उघडलेल्या शवपेटीत
मन चक्क डोळे चोळीत
उठून बसलेलं!
तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?
अकल्पनीय!
म्हणजे थडगं बांधूनही मन...
याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य !

Monday, December 6, 2010

अरूणा ढेरे - निरोप

बाबा रे,

निरोपाचा सोहळा करण्याइतके
जवळ काही उरले तरी आहे का ?

कबूल की दिल्याघेतल्या गोष्टींना
मनाचा वास होता एकेकाळी धुंद
पण आता चिमूटभर कोरडी मातीच ना नुसती ?
एक फोन उचलला तरी मधल्या अंतरातून
तारेवर सरसरतेय निर्जन वाळवंटच लांबलचक किती !

असं बघ
ही माती आणि ही वाळूदेखील
ओली असती पुरेशी
तर पेरली असती रोपे हिरवी
उद्या घमघमतील अशी
निदान नुसतीच रंग उधळणारीजशी गुलबशी

ते वृक्षारोपण आणि एखादे स्वप्नभरले नाजूक भाषण
एकमेकांसाठी एवढे तरी केलेच असते आपण.

म्हणून म्हणते,
हट्ट नको बाबा रे
आंदोळून गेले एकवार सुखाचे वारे
तथास्तु म्हणएवढेच पुरे.


Thursday, December 2, 2010

आई कामाहून येता - अंजूम मोमीन

आई कामाहून येता
पोरं बिलगली तिला
फुलं शोभतात चार
जशी हिरव्या वेलीला

कुणी गळा कुणी मांडी
जागा पोरांनी घेतली
लळा पाहताना असा
पृथ्वी सारी सुखावली

नाही वाडग्यात आज
शिळ्या भाताचाही दाणा
तिला भुकेल्या बाळांचा
प्रश्न पडलेला पुन्हा

उगीउगी पेटवली
चूल तिने भकभक
पाणी भांड्यात ठेवून
केला खोटाच सैपाक

पाणी उकळे नुस्तेच
नाही अंशही भाजीचा
आई म्हणते पोरांना,
"वास येतो ना सोजीचा?"

गाढ झोपली पाखरे
सैपाकाच्या नादामंदी
बांध मोडून वाहते
तिच्या डोळ्यांमधली नदी

Tuesday, November 30, 2010

पर्गती?

धानू शिरपती,
कुठं कशाची झाली रं पर्गती?

गाडी बी तीच
गडी बी तेच
बैल बी तेच
कासरा त्योच सैल
मग बदललं ते काय?
बैलाचं पाय?

उजव्या अंगाचा भादा बैल,
डाव्या अंगाला आला
पर,
त्यानं बदल रं काय झाला?
आता बसणाराना वाटतंय
जत्रा माघारी निघाली

माझ म्हननं
ही मजलच अवघड हाय
हे वझं जीवापरीस जड हाय

गाडी बी नवी बांधाय हुवी
रस्ता बी नवा कराय होवा
ताजीतवानी खोंडं जुपली
'त' कुणाला ठावं
जाईल गाडी सरळ
पण हे कुणी करायचं?
कसं करायचं?

पयला गाडीवान म्हनायचा
जल्दी जल्दी
आताचा बी म्हनतोय
जल्दी जल्दी
वाट बदलत न्हाई
बैल हालत नाही
धानू शिरपती,
ही कसली गा क्रांती?

-ग.दि.मा.




(‘पूरिया’ या ग.दि.मां च्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे. प्रस्तावनेत शांता शेळके लिहितात:
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कॄषिकांचे, दलितांचे, सा-या हीनदीन जनतेचे भाग्य उजळून टाकण्याच्या हेतूने शासन कटिबध्द झाले. नवनव्या योजना आखल्या गेल्या. उध्दाराचे नारे उठले. पण प्रत्यक्ष हातामधे काय आले? ‘पूरिया’ मधील ‘कृषिकांचे पालुपद’, ‘पर्गती’, ‘भूमिहीन’ या कविता लक्षणीय आहेत. उपरोधपूर्ण आणि तळमळीच्या भाषेत कवी ‘धानू शिरपती’ या कृषिकाशी त्याच्याच ग्रामीण बोलीभाषेत संवाद करत आहे. हा संवाद माडगूळकरांच्या उत्कट जाणिवेचा जसा निदर्शक आहे, तसा त्यांच्या नाटयात्म चित्रदर्शी शैलीचाही सुंदर नमुना आहे. ‘पर्गती’ या कवितेत सर्व शासनावरच बैलगाडीचे रुपक कवीने केले आहे.)

गीतांजलीतील चौथ्या कवितेचे (शीर्षकः प्रार्थना) मराठी भाषांतर

विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|

दु:खतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दु:खावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|


जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|

माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरुन जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|

माझे ओझे हलके करुन
तू माझे स्वांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दु:खांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|

रवीन्द्र्नाथ टागोर

Monday, November 29, 2010

स.ग. पाचपोळ

हंबरून वासराले चाटती जवा गायं तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. आया बाया सांगत व्हत्या,व्हतो जवा तान्हा दुस्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा पीठामंदी…..पीठामंदी पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय.. तवा मले पीठामंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. कण्या काट्या वेचायला मायं जाई रानी पायात नसे वाहन तिझ्या,फिरे अनवाणी काट्याकुट्या…रं काट्याकुट्या काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पायं तवा मले काट्यामंदी दिसती माझी मायं… दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. बाप माझा रोज लावी,मायेच्या मागं टूमनं बास झालं शिक्षाण आता,होऊदे हाती कामं आगं शिकूनं शानं…गं शिकूनं शानं शिकूनं शानं कुठं मोठा मास्तर व्हणार हायं तवा मले मास्तरमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. दारू पिऊन मायेला मारी जवा माझा बापं थरथर कापे अन् लागे तिले धापं कसा ह्याच्या…रं कसा ह्याच्या कसा ह्याच्या दावणीला बांधली जशी गायं तवा मले गायीमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं रे हंबरून वासरले……….. नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी नं भरल्या डोळ्यान…नं भरल्या डोळ्यान भरल्या डोळ्यान कवा पाहील दुधावरची सायं तवा मले सायीमंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं रे हंबरून वासरले…… गो म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जनम घ्यावा गं माये तुझ्या पोटी तुझ्या चरणी…गं तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावं तुझं पायं तवा मले पायामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं रे हंबरून वासरले चाटती जवा गायं तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं..

शिल्प : पु.शि. रेगे

जे सांगायचे
ते हवे कसे अगदी घट्ट
बांधेसूद्;
प्रत्येक शब्दाला एक प्रतिशब्द,
खुंट्या पिरगाळून
जागच्या जागी सुतंत्र
टांगलेला;
एकंदर ठाण कसे अगदी
वास्तुशिल्पित.
पण मध्येच
जे मधाचे पक्षी येऊन हलकारतात,
सळंग एखाद्या झाडाची सतारलेली
नक्षी वेल्हाळते,
वार्‍याची पताका चित्रावते,
त्याने सगळी आबोहवा वेगळून जाते
- मनासारखी.
शब्दांना
पटत नाही आपली पहिली ओळख.
ते बिथरतात
भलत्याच खुंट्या धरून बसतात्;
म्हणतात :
आम्हाला एक नवी भाषा
घालून द्या.
मी म्हणतो : हो, हो;
उगाच त्यांना चुचकारीत.

Saturday, November 27, 2010

अजिता काळे -- ती वेळ येईल तेव्हा

मंत्र नकोत, फुलं नकोत
भाषणंबिषणं तर नकोतच नको.
तुला तर ठाऊक आहेतच 
माझ्या सगळ्या आवडीनिवडी.

शेंदरी पानं गळताना 
बागेतून मारलेली चक्कर
शेकोटीच्या उबदार धगीसमोर
मन लावून घातलेले गोधडीचे टाके

मी स्वैपाक करीत असताना
तू मोठ्याने वाचलेल्या कविता
अंधार्‍या नि:शब्द हिमसेकात
एकाच पांघरूणामधली ऊब.

एक तेवढं लक्षात असू दे.
तशी काही चढाओढ आहे असं नाही. पण
तुझ्यावरचं प्रेम आणि शब्दांवरचं प्रेम
यामधलं अधिक तीव्र कुठलं?

तेही ठरवायचं कारण नाही.
काही कोडी न सोडवलेलीच बरी!
ती वेळ येईल तेव्हा 
फक्त एक कविता वाच.

--अजिता काळे 

Thursday, November 25, 2010

सौमित्र - पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.


मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.


पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.


पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.


पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.


दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं


पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.


रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.

सौमित्र - शेवटची निघून जाताना

तू निघून चाललीयेस कायमची हे कळल्यावर
अचानक लक्षात येतंय
तुझ्यावर लिहिणार होतो मी एक प्रेमकविता
तुझ्या नुस्त्या आसपास असण्या दिसण्यानेच जणू
आपोआप उमटत जातील ओळी कुठल्यातरी कागदावर
इतके माझे डोळे तुझे झाले होते
पण मधल्या काळात या शहराने
कुठलं तरी ट्रॅफिक जॅम , कुठलं तरी प्रदूषण ,
कुठला तरी कल्लोळ सोडला होता आपल्या दोघांमधे आता
तुला शेवटचं पाहताना बघ कशी स्लोमोशन झालीये गर्दी
तुझ्या हसण्याच्या उंच पुलावरून दिसतायत मला खाली
तरंगत चाललेली हजारो माणसं
डोक्यावर चंपाचमेलीमोगरागुलाब उगवलेली
साऱ्या मोटारी उडू लागल्यात फुलपाखरं होऊन
स्कुटरी गुणगुणू लागल्यात भुंग्यांसारख्या
सायकली चालताहेत आपोआप
कुणीतरी अदृश्य माणूस नुक्ताच सायकल शिकल्यासारख्या
रस्त्याच्या फांद्यांना रिक्शा लटकल्यात मधमाशांच्या पोळ्यांसारख्या
रेल्वेगाड्या यार्डातल्या वारुळांतून
कात टाकून बाहेर पडल्यात लखलख
आपण धावत सुटलो आहोत एका वेगळ्याच प्रवासाला
हे ठाऊक असल्यागत बसेस थांबून राहिल्यात सिग्नल्सवर
आपलीच वाट पाहात
आपण कफल्लक झालो आहोत पुरते हे कळल्यासारखे
वाटेवरचे सारे भिकारी
उधळत सुटलेत ओंजळींनी हवेत त्यांचे सारे सुटे पैसे
आणि नाण्यांच्या त्या अलगद पावसातून
आपण निघालो आहोत एकमेकांना बिलगून
बेफिकिरीच्या एकाच छत्रीखालून
आपल्याला खात्रीच आहे
जणू कंडक्टर आपल्याला सोडेल फुकट कुठवरही
आणि आता निर्वाणीच्या या क्षणी
तू भिजून उभी आहेस माझ्यात चिंब
आणि माझ्या डोळ्यात तुझंच प्रतिबिंब
एकमेकांचा हात सोडून
आपण आयुष्याच्या या सर्वात उंच कड्यावर उभे आहोत
झोकून द्यायला संपवायला सगळंच तुझ्यामाझ्यातलं
पण
एक तुझ्या लक्षात येतंय का... ?
झोकून देण्याआधीच
आपण ' पुन्हा ' तरंगायला लागलो आहोत

Wednesday, November 17, 2010

शान्ता शेळके - एकाकी

’तुझा’ आणि ’तुझ्यासाठी’
शब्द सारे खोटे,
खरी फ़क्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे
बिलगणारी बोटे तीही
बिलगून सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर.
दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?

कुसुमाग्रज - कोकिळा

कोकिळा जेव्हा सुरांचा
फ़ुलविते पंखा निळा
आम्र लेउनी पंख तेव्हा
होउ बघतो कोकिळा

कोकिळा जेव्हा स्वरांची
उघडिते अबदागिरी
जंगले शाहीर होती
शब्द होते मंजिरी

कोकिळा जेव्हा स्वरांची
काश्मिरे करते उभी
हो नदीची नृत्यशाला
रुमझुमे वारा नभी

कोकिळा जेव्हा स्वरांची
माळते सुमनावली
तेधवा वणवा म्हणे मी
चंदनाची सावली

कोकिळा घाली स्वरांचा
मोरपंखी फ़ुल्वरा
जांभळ्या डोही झपूर्झा
खेळती त्या आसरा

कोकिळा जेव्हा ढगांना
आर्ततेने बाहते
धूसरावर स्वप्न त्यांच्या
एक सुंदर वाहते

कोकिळा जेव्हा सुरांचे
गेंद गगनी फ़ेकते
अंचलावर पैठणीच्या
रात्र अत्तर ओतते

कोकिळा स्वरशिल्प असले
बांधता शून्यावरी
आसमंते होत सारी
क्षुब्ध आणिक बावरी

कोकिळा शिशिरात शिरुनी
बर्फ़ जेव्हा होतसे
या जगाला सर्व तेव्हा
जाग थोडी येतसे

Sunday, November 7, 2010

सुरमई

सुरमई

{किरण येले (मौज दिवाळी २०१०)}

तुम्हांला सुरमई माहीत आहे का ?
बरोब्बर!
चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही ?
पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल ?

अरे ! तुम्हाला तर सगळंच माहीत आहे;
तिची चमचमती त्वचा,
तिचं ताजेपण ओळखण्याची कला,
तिची महागलेली किंमत...
सगळंच.
आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही ;
तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते,
तिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते,
किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.

पण माफ करा,
तुम्हांला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे
असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे;
तुम्हांला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही,
तुम्हांला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही,
तुम्हांला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहीत नाही,
आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर
तुम्हांला नक्कीच माहीत नाही!

एक सांगतो,
रागावू नका;
तुम्हांला खरं तर
सुरमईची फक्‍त चव माहीत आहे,
सुरमई नाही.

आणि जे सुरमईच्या बाबतीत
तेच-
अगदी
तेच-
बाईच्याही

Wednesday, November 3, 2010

आनंदलोक - कुसुमाग्रज

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा लेवून.

बा. भ. बोरकर: चित्रवीणा

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखासवे होऊनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलूनि गेला गगनमंडला
फ़णा डोलवित झोंबू पाहॆ
अस्तरवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तिचा पानोपानी
बघून झाले ओलेओले

कुठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीनकांति गोरे गोरे

फूलपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटींबे
आरसपानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राउळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीणा
अजूनि करते दिडदा दिडदा

Thursday, October 28, 2010

कविता आहे.. ती आहे आणि असणारच आहे.

कवितेच्या वाटेवर या सदरातील हा शेवटचा लेख.कवितांच्या गावात वसलेला असावाच म्हणून येथे..

अरुणा ढेरे , शनिवार, १९ डिसेंबर २००९

प्रिय सुनीताबाई,
संध्याकाळचं आणि सकाळचं काही नातं असतं का? दोन्हीकडे दोघींसाठी उमलणारी फुलं आणि वेल्हाळणारी सोनारी उन्हं असतात हे खरं. आरती प्रभूंची एक कविता आहे ना-
सकाळ की सांज
कुणी म्हणायचे खोटी
दोन्हीकडे फुले
उन्हे माहेराला येती..
माहेरी आलेली उन्हं असतात आणि उमलती फुलंही असतात. पण सकाळच्या फुलांना दिवसभर उमलून असण्याचं आणि उन्हांना लखलखून उजळत राहण्याचं आश्वासन असतं. संध्याकाळ मात्र दोघांनाही चुपचाप अज्ञाताच्या अंधाराकडे सोपवून देते. दोघींमध्ये अंतर आहेच ना! सकाळ आणि संध्याकाळ मधलं अंतर. उल्हास आणि आसवं यांच्यामधलं अंतर. या कवितेचं पहिलं कडवं त्या अंतराचंच आहे.
खोप्यात सकाळी जागी होते चिमणी. जगण्याचा उल्हास आणि उडण्याचा आस घेऊन जागी झालेली चिमणी आणि दिवसभराचा अनुभव घेताना आत खोल झिरपलेल्या सुख-दुखांनी भरून येणारे डोळे! संवेदनांशी इमान राखणारे त्या डोळ्यांतले अश्रू!
सकाळची जाग
जशी खोप्यात चिमणी
सांजवेळी अश्रू
असे डोळ्यांस इमानी..
असं असलं तरीही दोघींमध्ये एक नातं आहेच. अंतर लंघून असणारं नातं!
कधी सकाळीही
ऊर भरू येता खोल
दिवेलागणीला
वाटे पाऊस पडेल..
असलं काही आतलं आतलं उमजलेले आरती प्रभू तुमचे केवढेतरी आवडते, यात नवल नाही. आपल्या जगण्याच्या पात्रात कधीतरी हिरव्या पानांच्या द्रोणांमधून तरंगत जाणारे केशरी दिवे दिसावेत, तशा त्यांच्या कविता खोप्यातल्या चिमणीसारखी संवेदनांची आतली जाग सगळ्या बाहेरच्या धकाधकीत टिकवून ठेवताना तुम्हाला त्या दिवेलागणीनं फार फार सुख दिलं.
कवी नव्हता तुम्ही. पण म्हणजे रुढ अर्थानं तुम्ही कविता लिहिल्या नाहीत, इतकंच. तुमच्या ललितबंधांत कवितेची जरीकाठी कशी मनोज्ञ नक्षीनं विणलेली आहे. कवितेवरच्या प्रेमानं भरलेलं एक प्रगल्भ, सृजनशील असं रसाळ मन तुमच्याजवळ होतं आणि कवितेनंही तुम्हाला जन्ममैत्रीण म्हणून स्वीकारलं होतं. ‘आहे मनोहर तरी’ हे तुमचं पहिलं जीवनचिंतन तुम्ही कवितेलाच तर अर्पण केलंत! किती जवळ होती कविता तुमच्या! भाईंबरोबरचे कितीतरी प्रवास सारा रस्ताभर कविता आठवत, म्हणत तुम्ही केलेत. तुमच्या घरी केलेल्या, ऐकलेल्या कवितांच्या सणा-उत्सवांचे रंग अजून पुष्कळांच्या मनावरून पुसले गेले नसतील.
काही प्रसंग शब्दांत कधी आणू नयेत, हे खरं असलं तरी तुमच्या घरातल्या सोफ्यावर- जिथे तुम्ही नेहमी बसायचात- तिथे बसलेले, थकलेले, आधी गेलेल्या मित्रांच्या स्मरणानं विकल झालेले श्री. पु. भागवत आणि त्यांच्या पायांशी खाली जमिनीवर बसून ‘अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चकाकते..’ म्हणणाऱ्या तुम्ही- असं एक डोळे ओलं करणारं चित्र अजून माझ्या आठवणींपाशी अगदी स्वच्छ, जिवंत आहे.
कितीतरी वेळा तुमचा फोन यायचा तो एखादी कविता आठवल्यावर किंवा पुरी आठवण्यासाठी. कितीतरी वेळा भेट व्हायची ती कवितेवर बोलण्याचं राहून गेलेलं बोलण्यासाठी आणि नव्या कवितेनं उमलून येण्यासाठी.
पुलंबरोबर तुम्ही मर्ढेकर, बोरकर, आरती प्रभूंच्या कवितांचं अभिवाचन जाहीरपणे केलंत. तोपर्यंत स्वतच्या कविता कवी व्यासपीठावरून ऐकवत होते. तुम्ही इतरांच्या कविता तुमच्याशा करून घेऊन आलात आणि अभिवाचनाची एक नवी दिशा दाखवलीत. मराठी वाङ्मयाविषयीचा तो एक सूक्ष्मसुंदर विस्तार होता. तुमचं त्या वाचनातलं दर्शन किती अपूर्वाईचं! तुमचे डोळे, तुमचे हात, तुमचा सगळा देह.. तुम्हीच ती कविता असायचा. तुमच्यातली अभिनेत्री तुमच्यातल्या रसिकतेबरोबर आपल्या सगळ्या गुणसंपदेचं अत्यंत संयत आणि अत्यंत तालेवार दर्शन देत असल्याचा तो उत्कट अनुभव होता.
कवितेनं तुमचं भिजून जाणं किती वेळा पाहिलं. पुलं असतानाच तुमच्या डोळ्यांची तक्रार वाढत गेली होती. वाचन कमी कमी होत चाललं होतं. अलीकडच्या चार-पाच वर्षांत तर ते जवळजवळ थांबलंच होतं. मग तुमच्याजवळ असायची ती तुमच्या आठवणीतली कविता. तिचा पैस फार मोठा नव्हता. मोजकेच कवी आणि मोजक्याच कविता. पण त्यांचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याइतका वाढवला होता. म्हणून शब्दांचा हात धरत त्यापलीकडच्या आशयापर्यंत उतरत जाणं आणि त्यात गर्द भिजून जाणं तुम्हाला सहजशक्य होत होतं.
कविता तुमच्या अगदी आतल्या गाभ्यालाच भिडली होती. तुमच्या स्वयंभू एकटेपणात फक्त तीच तुमच्या जवळ येऊ शकत होती. नव्हे, दोन्ही हातांनी तुम्हीच तिला तुमच्या जिवाजवळ घट्ट ओढून धरलं होतं. कविता इतकी सोबत करू शकते? अगदी प्रिय माणसाइतकी? त्याच्याहीपेक्षा जास्त? तुमचे आरती प्रभू लिहून गेले होते..
अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा..

आजारी होऊन अंथरुणाला अगदी खिळूनच होतात. काही काळ असा आला की, तुम्ही अर्धवट ग्लानीत असायचा. जाणीव आणि नेणीव यांच्यामधली ये-जा सुरू असायची. तुमचा हात हातात घेऊन, कपाळावर हात ठेवून पाहिलं तरी स्पर्श पोहोचायचा नाही तुमच्यापर्यंत.. हात पोहोचायचा नाही. कधी चुकून डोळे उघडले तरी अनेकदा ओळख नजरेत दिसायची नाही. पण तुमच्या आवडीची एखादी कवितेची ओळ म्हणू लागल्यावर ते शब्द मात्र तुमच्या विस्मृतीच्या अंधारात अगदी तळापर्यंत उतरत जात असणार आणि ‘दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले’ असा उजेड तिथे हळूहळू पसरत असणार. कारण तुमचे डोळे मिटलेले असले तरी ओठ हलू लागायचे.
‘गंधगर्भ भुईपोटी ठेवोनी वाळली’ अशी ओळ म्हटली की पाठोपाठ तुमचा अतिक्षीण आवाज यायचा- ‘भुईचंपकाची पाने कर्दळीच्या तळी..’ वाटायचं- या भुईचाफ्याची पानं खरीच आता वाळली आहेत, पण भुईच्या पोटात जो गंधाचा कंद त्यांनी ठेवला आहे, त्याचा एक मंद सुगंध या अखेरच्या वळणावर येतो आहे आपल्याला. तुम्हालाही तो येत असेल असं खात्रीनं वाटायचं. इतकं तुमच्या अगदी जवळ आणखी कोणी नव्हतं. काही नव्हतं. तुम्ही लिहिलंत तशा प्रेम करणाऱ्यांच्या जातीत जन्माला आला होता तुम्ही. आणि तुम्ही म्हणतच असा की, प्रेम म्हणजे सर्वस्व समर्पण. कवितेवर तुम्ही फार फार प्रेम केलं.
हे सदर सुरू झालं तेव्हा तुम्ही फारशा भानावर नव्हताच. आता हे संपत असताना तुम्ही इथे- या जगातच नाही आहात. तुमच्या बाकीबाब बोरकरांनी म्हटलं होतं..

मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरीतिप्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे
मी विझल्यावर त्या राखेवर पण कोऱ्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या धरतील चंद्रफुलांची छत्री..


तुम्हाला मरणाचं भय कधी वाटलं नाही. आणि त्यानंतर मागे काय होईल, याचा तर विचारही तुम्ही केला नाही. पण आम्हाला असं वाटतं, तुमच्या आवडत्या कवितांनी तुमच्या डोक्यावर आता ती तशीच चंद्रफुलांची छत्री धरली असेल आणि ती छत्री घेऊन आनंदानं हसत तुम्ही त्या गहनगाढ अंधारात शिरला असाल.
तुमच्या एकटेपणाबद्दल मनाला कधी विषाद वाटला नाही. कींव करावी असलं काही तुमच्याजवळ कधी फिरकलंही नव्हतं. उलट, काहीतरी दरवळणारं, बहरलेलं पाहिल्याचा भाव मनात भरून यायचा. तुम्हाला निरोप देतानाही मनात तसाच, तोच भाव होता आणि आहे. खूप मोठी असते कविता. तिची सोबत अख्ख्या आयुष्याला पुरेशी असते- नव्हे, पुरूनही उरते. हे तुमच्याइतक्या जवळून अनुभवताना आता स्वतला आणि सगळ्यांनाच सांगावंसं वाटतंय की, कविता आहे.. ती आहे आणि असणारच आहे.
निरोप द्यायचा आणि घ्यायचा, तो इतकाच.

Sunday, October 24, 2010

एक चांदणी - मंगेश पाडगावकर

एक चांदणी, कोसळताना
गीत म्हणाली
गीत म्हणाली आणिक नंतर
पत्थर झाली

सरळ भाबडी वाट अचानक
वनात वळली
वनात वळली आणि नंतर
डोहात बुडली

सर्वस्वाचे दान उधळण्यां
कुणी तळमळली
तळमळली अन डोळे मिटुनि
मनात जळली

अजुनी कधितरी पत्थरातुनी
कण्हते गाणे
डोहाकाठी फिरे पाखरू
केविलवाणे

Thursday, October 21, 2010

किती तरी दिवसांत.....

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा


- बा.सी.मर्ढेकर

Monday, October 18, 2010

कुसुमाग्रज - काही बोलायाचे आहे





काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही,
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही,

माझ्या अंतरात गंध, कल्प कुसुमांचा दाटे,
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही,

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज,
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही,

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला,
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही,

दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी,
त्याचा कोष किनाऱ्यास कधी दिसणार नाही,

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी,
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही,




Friday, October 15, 2010

आरती प्रभू : एका रिमझिम गावी

एका रिमझिम गावी
भरुन आहे हृदयस्थ तान
पण
स्वगत विसरुन तिथे
जातां आलं पाहिजे

चालून ज़ाता येण्यासारखी
पायतळी आहे माती
पण
जाणें न जाणें तरी कुणाच्या हाती?

Wednesday, October 13, 2010

विन्दा करंदीकर - चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकलें न श्रेय सारें
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे.

मी चालतों अखंड चालायचें म्हणून;
धुंदींत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे;
हें शीड तोडले कीं अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनाचा मीं फाडला नकाशा;
विझले तिथेंच सारे ते मागचे इशारे.

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हें जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे.

आशा तशी निराशा, हें श्रेय सावधांचें;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे.

Tuesday, October 12, 2010

मर्ढेकर - शिशिरागम

शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
नकळे उगाच रडावया.
पानात जी निजली इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरें!

           फुलली असेल तुझ्या परी,
           बागेतली बकुलावली;
           वाळूंत निर्झर-बासरी;
           किती गोड ऊब महितलीं!
           येतील हीं उडुनी तिथे,
           इवली सुकोमल पाखरें,
           पानात जीं निजली इथे.
           निष्पर्ण झाडिंत कांपरें!
           पुसतो सुहास, स्मरुनिया
           तुज आसवें, जरि लागलें
           एकेक पान गळावया
           शिशिरर्तुच्या पुनरागमें.

Friday, October 8, 2010

आरती प्रभू : मृत्यूत कोणी हासे

मृत्युत कोणि हासे, मृत्युस कोणि हसतो
कोणि हसून मरतो, मरत्यास कोणि हसतो.

अश्रूत कोणि बुडतो, लपवीत कोणि अश्रू.
सोयीनुसार अपुल्या कोणि सुरात रडतो.

जनता धरी न पोटी साक्षात जनार्दनाला
जनतेस कोणि पोटी पचवून हार घेतो.

विजनी कुणी सुखी अन भरल्या घरात कोणि
वनवास भोगणारा दुःखात शांत गातो.

कोणी जुनेपुराणे विसरे न पीळ धागे,
कोणी तुटून पडला, सगळ्याच पार जातो.

कोणास मेघपंक्‍ती दाटून गच्च येतां
लागे तहान, कोणी नाचून तृप्त होतो.

कोणी दिव्याशिवाय होतो स्वतःच दीप
कोणी दिव्यावरी अन टाकून झेप देतो.

Thursday, September 30, 2010

मेरी आवाज ही

मला माहित नाही याला गाणं म्हणायच की कविता. पण माझं हे अतिशय आवडत गाणं आणि तेव्हढेच आवडते शब्द.

माझ्या आवाज हरवलेल्या मित्रास....

नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा
मेरी आवाजही पेहेचान है, गर याद रहे

वक्तके सितम कम हसी नही, आज है यहा कल कही नही
वक्तके परे अगर मिल गये कही
मेरी आवाजही पेहेचान है, गर याद रहे

जो गुजर गयी कल की बात थी, उम्र तो नही एक रात थी
रात का सिरा अगर फिर मिले कही
मेरी आवाजही पेहेचान है, गर याद रहे

दिन ढले जहा रात पास हो, जिंदगी की लौ उन्ची कर चलो
याद आये गर कही जी उदास हो
मेरी आवाजही पेहेचान है, गर याद रहे

- गुलझार

हे गाणं इथे ऎकता / पाहता येईल

http://www.youtube.com/watch?v=VTTPentp0_g&feature=related

Monday, September 27, 2010

अरुणा ढेरे : इतक्यातच

इतक्यातच झिमझिमून सर गेली
झुकुन उन्हे, मिटून पुन्हा वर आली

रंग नवा स्वप्नांवर चढत पुन्हा
इतक्यात आस नवी मोहरली

फूल जसे, जीव तसा उमलत ये
इतक्यातच कळ दुखरी सरलेली

खटमधुर जीवनरस टपटपतो
इतक्यातच ऒंजळ ही भरलेली

इतक्यातच गडद तुझी ही सय झाली
विस्कळल्या जगण्याला लय आली

Wednesday, September 22, 2010

मर्ढेकर

            दवांत आलिस भल्या पहाटीं
            शुक्राच्या तोर्‍यांत एकदा;
            जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
            तरल पावलांमधली शोभा.

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस;
                                            ---मागे
             वळुनि पाहणे विसरलीस का?
             विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
             डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
             सांग धरावा कैसा पारा !

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची द्यावी सांग;
             कोमल ओल्या आठवणींची
             एथल्याच जर बुजली रांग !

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणिं वाचाव्या, कुणिं पुसाव्या;
             तांबुस निर्मल नखांवरी अन
             शुभ्र चांदण्या कुणिं गोंदाव्या !
    
         दवांत आलिस भल्या पहाटीं
         अभ्रांच्या शोभेंत एकदा;
         जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
         मंद पावलांमधल्या गंधा.

Monday, September 20, 2010

सुजाता लोहकरे : आपले सामान्य आभाळ!

आपल्याला नसतेच ठाऊक
आपल्या आभाळाची उंची
आतली अन बाहेरचीही.
आपल्यासाठी असते ती
आपल्या दृष्टीच्या झेपेइतकी.
सवयीच्या, ओळखीच्या, सुरक्षित अवकाशात
आपणच आखलेली.
कधीतरी...
दाखवतं..जागवतं..हलवतं..
कुणीतरी आपल्याच आतलं अनिश्चित, असीम आभाळ-
शब्दांनी, सुरांनी, स्पर्शांनी...
आपल्यातल्याच काळ्यापांढर्‍याला
एकमेकांत मिसळीत बनलेल्या करड्यांच्या असंख्य छटांनी.
मग दिसायला नि उमगायला लागतात
त्या करड्याशी उठलेली
अनंत रेषांची आपापली मोर-वळणे!
हसरी, नाचरी, दुखरी
स्वत:ला मिरवणारी,
स्वत:च मुरलेली,
कुणातून तरी उठलेली,
कुणापाशी तरी मिटलेली,
तुर्‍यातुर्‍यात खोचलेली
आकाशात सुटलेली....!
नवेच होऊन जातात अशानं
स्वत:कडे पाहण्याचे सगळे सरावाचे रस्ते
धडपडते दृष्टी... झेपावते
संकटांच्या, पराभवाच्या भीतीवरून अलगद...
उंचच उंच होऊ पाहते
आपले सामान्य आभाळ!

Saturday, September 18, 2010

विंदा करंदीकर - एक प्रश्नोत्तर

रस्त्याच्या दगडी छातीवर
वाट लाजरी भाळून गेली
आणिक घेऊन वळण जरासे
जरा लाजुनी त्यास म्हणाली..
'कोठून आला सांगा ना पण ,
कुठे चालली आपुली स्वारी..?'
रस्ता वदला, 'ते नच माहित,
मागून आलो, पुढे भरारी'
वाट म्हणाली, 'का प्रेमाला
या प्रश्नांचे पथ्य असे तर..?'
रस्ता वदला, 'प्रेमामध्ये
प्रश्न संपती उरते उत्तर!'
वाट मिळाली रस्त्याला मग
लाली चढली त्या रस्त्यावर,
वटवृक्षाने म्हटले मंगल
तोही होता उभा तिठ्यावर!

Thursday, September 16, 2010

इंदिरा संत


तारेवरती असती थांबुन,
थेंब दवाचे;
मनात ज्यांच्या,
इवले कांही, हिरवे पिवळे चमचमणारे....

सतारीवरी असती थांबुन
थेंब सुरांचे;
मनात ज्यांच्या,
इवले कांही,निळे जांभळे झनझनणारे....

छेडुन तारा करांगुलीने
ओठ करावे पुढती;
टिपायला ती थेंबाथेंबी...

Sunday, September 12, 2010

महानोर : पक्ष्यांचे लक्ष थवे

पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
वार्‍यावर
गंधभार
भरलेले ओचे,
झाडांतुन
लदबदले
बहर कांचनाचे,
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे.

Wednesday, September 8, 2010

ग्रेस

मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥

श्वासांचे घेउन बंधन,
जे हृदय फुलांचे होई ।
शिशिरात कसे झाडांचे,
मग वैभव निघुन जाई ॥

सळसळते पिंपळ-पान,
वाऱ्यात भुताची गाणी ।
भिंतीवर नक्षत्रांचे,
आभाळ खचवीले कोणी ॥

मन बहर-गुणांचे लोभी,
समईवर पदर कशाला ।
हे गीत तडकले जेथे,
तो एकच दगड उशाला ॥

चल जाऊ दूर कुठेही,
हातात जरा दे हात ।
भर रस्त्यामध्ये माझा,
होणार कधितरी घात ॥

मन कशात लागत नाही..।
मन कशात लागत नाही..॥

Monday, September 6, 2010

वा.रा.कान्त - दु:खालाच कारण होतात

दु:खालाच कारण होतात त्याच्या
सांबराची शिंगे,
तसेच माणसांचे संबंधही.
मीही एक शिंग त्यांच्यातले
तुझ्यासाठी. पण
तू तरी सांबर आहेस, की---
की तूही एक शिंगच?
शिंगांना नसते समज;
सांबरालाही हे कळत नाही
फांद्यात शिंगे घुसेपर्यंत;
शिंगांचाही नाईलाज असतो:
त्यांना दिसत नाहीत झाडे, फांद्या;
सांबरालाही स्वत:चाच वेग असहाय बनवतो;
वर तळ्यातल्या प्रतिबिंबाने केलेला असतो
त्याचा ’नार्सीसिस.’
प्रतिबिंब तळ्यात राहते;
सांबर झाडात अडकते;
तडकतात आरसेही तळ्यांचे उन्हाळ्यात.
ते असो.
तू सांबरशिंगाचा लेप लाव
आपल्या जखमेवर;
पहा, वेदना कमी झाल्या तर!

Saturday, August 28, 2010

बा. भ. बोरकर - दिसली नसतीस तर

रतनअबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्याजांभळ्या वस्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगानी फुलारलाच नसता 

आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जीवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शब्दातून
कातरवेळची कातरता
आज अशी झिणझिणत राहिलीच नसती 

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सांद्र-मंद्र सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्या भाबड्या जनावरांची
आर्जवी हळुवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती 

तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही;
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यंत
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरु शकलेलो नाही
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फुलांनी
असा डवरलाच नसता 

तू तेव्हा आकाशाएवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारुण
निराशा मला देऊन गेली नसतीस
तर स्वतःच्याच जीवन शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
निःसंग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो 

तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीसः
माझी सशरीर नियती होतीस
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो 

Monday, August 23, 2010

अरुणा ढेरे : देता यावे...

देता यावे हसू
निरभ्र अकलंकित
निरागस तान्ह्याच्या आनंदाइतके सहज कोवळे

देता यावे हात
निर्हेतुक आश्वासक
स्वत:ला स्वत:चा आधार देण्याइतके स्वाभाविक मोकळे

देता यावे शब्द
अम्लान निःसंशय
आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार

देता यावे हृदय
अपार निरामय
दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार

Monday, August 16, 2010

नारायण सुर्वे: विझता विझता स्वत:ला....


झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हांलाही आली; नाहीच असे नाही।

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही।

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप; नाहीत असे नाही।

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही।

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत्:ला सावारलेच नाही, असेही नाही।

Saturday, August 14, 2010

इंदिरा संत : मरवा

पुस्तकातील खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार काहिसे
देता घेता त्यात थरारे.

मेजावरचे वजन छानसे
म्हणून दिला नाजूक शिंपला;
देता घेता उमटे काही
मिना तयाचा त्यावर जडला

असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातिल त्याहून हिरवा.

Friday, August 6, 2010

अरुणा ढेरे : यक्षरात्र

पाण्यासारखेच, वाहते सदाचे
आयुष्य नावाचे, खुळे गाणे

किनारे धरुन, अखंड चालला
दुःखांचा काफिला, मस्तपणे

सुखाचेही तळ, जाताना घासून
अस्तित्वाची खूण, कळे मला

दिव्यापरी आता, प्राक्तन जोडून
प्रवाही सोडून, श्‍वास दिला

आणि रंगगर्द, क्षितिज पेटले
रात्री उजाडले, क्षणमात्र

तमाने टाकली प्रकाशाची कात
झाली काळजात, यक्षरात्र !

Wednesday, August 4, 2010

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती, करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

- कुसुमाग्रज

Monday, August 2, 2010

आकाश उजळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

सुरेश भट

Saturday, July 31, 2010

अरुणा ढेरे : अनय

अनय
नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून.
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून.

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा आळता लावलेली तुझी पावले.
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता.

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न कण
प्रेमाच्या चेहर्‍यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.

राधे, पुरुष असाही असतो !

Tuesday, July 27, 2010

सौमित्र : तर काय करायचं?

परक्या देशात
दिवसाढवळ्या सुनसान रस्त्यावरुन चालताना....
आपल्या देशातले गजबजलेले रस्ते आठवले
                                                         तर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस  सोबत असताना
एकटं वाटलं  तर काय करायचं
परक्या देशात
आपलं माणूस सोबत असताना
एकटं ’नाही’ वाटलं  तर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस सोबत असताना
’त्याला’ एकटं वाटू लागलं  तर काय करायचं....
परक्या देशात आपलं माणूस
आधीच एकटं असेल तर काय करायचं
आणि परक्या देशात
आपलं माणूस कुणासोबत असेल
                                           तर काय करायचं?
परक्या देशात
लहानपणी गर्दीत हरवलं होतं म्हणून
आपलं माणूस ओळखीची गर्दी सोडून
अनोळखी गर्दीत आलंय उठून
’हे’ कळल्यावर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस
खूपच आपलं वाटू लागल्यावर
आपण आपलीच सोबत सोडून देऊन
हरवून गेलो
आणि सापडलो नाही आपल्यालाच
                                             तर काय करायचं....  
परक्या देशात
प्रत्येक मिठीसरशी साठवून घेतला सुगंध आपल्या माणसाचा....
आणि आपल्या देशात
कधीतरी अचानक
सुटला घमघमाट त्या सुगंधाचा
तर काय़ करायचं....
आपल्या देशात
परक्या देशातल्या आपल्या माणसाची
आठवण आली अचानक
आणि हरवून गेला साठवलेला सुगंध
                                                तर काय करायचं....   
परक्या देशात 
सोबत घालवलेली संध्याकाळ
आपल्या देशात
’संध्याकाळी’ आठवली तर काय करायचं?
 
खरंच!
परदेशातून
एकटं परतल्यावर
आपल्या देशात 
काय करायचं?

Wednesday, July 21, 2010

शांता शेळके

सहज फुलू द्यावे फुल सहज दरवळावा वास
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास
सुवास, पाकळ्या, पराग, देठ - फुल इतकीच देते ग्वाही
अलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही

दोन पावलांपुरते जग तेच अखेर असते खरे
हिरवीगार हिरवळ तीच, त्याच्यापुढे काय उरे?
पुढे असते वाळवंट फक्त, करडे, रेताड आणि भयाण
निर्वात पोकळीमध्ये अश्या गुदमरून जातात प्राण

फुल खरे असेल तर सुवास तोही आहे खरा
वाळूइतकाच खरा आहे वाळूमधला खोल झरा
थेंबामध्ये समुद्राची जर पटते सहजखुण
सुंदराचा धागा धागा कशासाठी घ्यावा उकलून?

मुखवटाही असेल, असो... मागले काहीच नये दिसू
साधे शब्द पुरेत तेच, एक साधे सोपे हसू...

बा.भ.बोरकर.

कळत जाते तसे कशी जवळचीही होतात दूर?
जुने शब्द सुने होउन वाजतात कसे बद्द निसूर?

कळत जाते तसे कसे ऊन पाण्यात खिरुन जाते
वाकुड सावल्यात वाट चुकून चांदणे कसे झुरून जाते?

कळत जाते तसे कशा मूर्ती सार्‍या झिजून जातात
पापण्यांमधले स्नेह थिजून ज्योती कशा विझून जातात?

कळत जाते तसे कशी झाडे पाखरे जीव लावतात
शब्द सारे मिटून कसे तळ्यामधेच पेंगू लागतात?

कळत जाते तसे कशा दूरच्या घंटा ऐकू येतात
दूरचे रंग दूरचे गंध प्राण कसा वेधून घेतात?

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

भाऊसाहेब पाटणकर

जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले

आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मी मेलो, आता बोलू नये

कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला

बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी

मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले

थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले

ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही

त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला

लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला

जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.

Tuesday, July 20, 2010

ऊंचाई

ऊँचे पहाड़ पर,
पेड़ नहीं लगते,
पौधे नहीं उगते,
न घास ही जमती है।

जमती है सिर्फ बर्फ,
जो, कफ़न की तरह सफ़ेद और,
मौत की तरह ठंडी होती है।
खेलती, खिल-खिलाती नदी,
जिसका रूप धारण कर,
अपने भाग्य पर बूंद-बूंद रोती है।

ऐसी ऊँचाई,
जिसका परस
पानी को पत्थर कर दे,
ऐसी ऊँचाई
जिसका दरस हीन भाव भर दे,
अभिनंदन की अधिकारी है,
आरोहियों के लिये आमंत्रण है,
उस पर झंडे गाड़े जा सकते हैं,

किन्तु कोई गौरैया,
वहाँ नीड़ नहीं बना सकती,
ना कोई थका-मांदा बटोही,
उसकी छाँव में पलभर पलक ही झपका सकता है।

सच्चाई यह है कि
केवल ऊँचाई ही काफ़ी नहीं होती,
सबसे अलग-थलग,
परिवेश से पृथक,
अपनों से कटा-बँटा,
शून्य में अकेला खड़ा होना,
पहाड़ की महानता नहीं,
मजबूरी है।
ऊँचाई और गहराई में
आकाश-पाताल की दूरी है।

जो जितना ऊँचा,
उतना एकाकी होता है,
हर भार को स्वयं ढोता है,
चेहरे पर मुस्कानें चिपका,
मन ही मन रोता है।

ज़रूरी यह है कि
ऊँचाई के साथ विस्तार भी हो,
जिससे मनुष्य,
ठूँठ सा खड़ा न रहे,
औरों से घुले-मिले,
किसी को साथ ले,
किसी के संग चले।

भीड़ में खो जाना,
यादों में डूब जाना,
स्वयं को भूल जाना,
अस्तित्व को अर्थ,
जीवन को सुगंध देता है।

धरती को बौनों की नहीं,
ऊँचे कद के इंसानों की जरूरत है।
इतने ऊँचे कि आसमान छू लें,
नये नक्षत्रों में प्रतिभा की बीज बो लें,

किन्तु इतने ऊँचे भी नहीं,
कि पाँव तले दूब ही न जमे,
कोई काँटा न चुभे,
कोई कली न खिले।

न वसंत हो, न पतझड़,
हो सिर्फ ऊँचाई का अंधड़,
मात्र अकेलेपन का सन्नाटा।

मेरे प्रभु!
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना,
ग़ैरों को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई कभी मत देना।

- अटल बिहारी वाजपेयी

Monday, July 19, 2010

यौवनयात्रा

अशी हटाची अशी तटाची
उजाड भाषा हवी कशाला?
स्वप्नांचे नव गेंद गुलाबी
अजून फुलती तुझ्या उशाला

अशीच असते यौवनयात्रा
शूल व्यथांचे उरी वहावे
जळत्या जखमांवरी स्मितांचे
गुलाबपाणी शिंपित जावे

जखमा द्याव्या जखमा घ्याव्या
पण रामायण कशास त्याचे?
अटळ मुलाखत जर अग्नीशी
कशास कीर्तन रोज धुराचे?

उदयाद्रीवर लक्ष उद्याची
पहाट मंथर तेवत आहे
तुझ्याचसाठी लाख रवींचे
गर्भ सुखाने साहत आहे!

-कुसुमाग्रज

Sunday, July 18, 2010

चाफ्याच्या झाडा..

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात

फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

- पद्मा गोळे.

Tuesday, July 13, 2010

विन्दा : साठीचा गझल

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो---खोटे कशास बोला---
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी!

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी.

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करुन छाटी!

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारूतिला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी!

प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी!

Saturday, July 10, 2010

प्रेमाचा गुलकंद.......प्र.के.अत्रे

बागेतुनी व बाजारातुनी
कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत
‘तिज’ला नियमाने
कशास सान्गू प्रेम तयाचे
तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिन्ग यातले
काय असावे ते!

गुलाब कसले प्रेम पत्रीका
लाल गुलबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या
पाठोपाठ नुसत्या

प्रेमदेवता प्रसन्न हो! या
नैवद्याने
प्रेमाचे हे मार्ग गुलबी
जाणती नवतरणे

कधी न त्याचा ती अवमानी
फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला
कधीही मुग्धपणा

या मौनातच त्यास वाटले अर्थ
असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग
मनातले बोल

अखेर थकला ढळली त्याची
प्रेमतपश्चर्या
रन्ग दिसे ना खुलावयाचा
तिची शान्त चर्या

धडा मनाचा करुन शेवटी म्हणे
तिला ‘देवी’
दुजी आणखी विशेषणे तो
गोन्डस तिज तो लावी

“बान्धीत आलो पुजा तुज मी
आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू
भक्ताचे काज

गेन्द गुलाबी मुसमुसणारे
तुला अर्पिलेले
सान्ग सुन्दरी फ़ुकट का सगळे
गेले?”

तोच ओरडून त्यास म्हणे ती
“आळ ब्रु था हा की
एक पाकळी ही न दवडली तुम्ही
दिल्यापैकी”

हे बोलूनी त्याच पावली आत
जाय रमणी
क्षणात घेउन ये बाहेरी
कसलीशी बरणी

म्हणे “पहा मी यात टाकले
तुमचे ते गेन्द
आणि बनवला तुमच्या साठी
इतुका गुलकन्द

का डोळे असे फ़िरवता का आली
भोन्ड
बोट यातले जरा चाखुनी गोड
करा तोन्ड”

क्षणैक दिसले तारान्गण
त्या परी शान्त झाला
तसाच बरणी आणि घेवुनी
खान्द्यावरी आला

“प्रेमापायी भरला” बोले
“भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकन्द तरी
कशास हा दवडा?”

याच औषधावरी पुढे तो कसातरी
जगला
‘दय थाम्बुनी कधीच ना तरी
असता तो’ खपला!

तोन्ड आम्बले असेल
ज्यान्चे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकन्द तयानी
चाखूनी हा बघणे

कुसुमाग्रज : तो प्रवास सुंदर होता

आकाशतळी फुललेली
मातीतिल एक कहाणी
क्षण मावळतीचा येता
डोळ्यांत कशाला पाणी ?

तो प्रवास सुंदर होता
आधार गतीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आश्वासन माथ्यावरती

सुख आम्रासम मोहरले
भवताल सुगंधित झाले
नि:शब्द वेदनांमधुनी
गीतांचे गेंद उदेले

पथ कुसुमित होते काही
रिमझिमत चांदणे होते
वणव्याच्या ओटीवरती
केधवा नांदणे होते

Friday, July 9, 2010

पत्र लिही

पत्र लिही पण नको पाठवू
शाईअमधुनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळी मधुनी
नको पाठवू हसू लाजरे;

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटींतुन
नको पाठवू तिळ गालिचा
पुर्णविरामाच्या बिंदूतुन

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन,
कागदातुन नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू विज सुवासिक
उलगडणारी घडी घडीतुन,
नको पाठवू असे कितीदां
सांगितले मी; तू हट्टी पण

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायचे राहुन जाते.

इंदिरा संत
नीरज स्मिता खास तुम्हा दोघांसाठी. काल पाठवू शकलो नाही.

Thursday, July 8, 2010

पत्र लिही पण

पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधुनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधुनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तिळ गालीचा
पूर्णविरामाच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी: तू हट्टी पण...

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते

-इंदिरा संत ('रंगबावरी')

मी विझल्यावर

मी विझल्यावर
त्या राखेवर
नित्याच्या
जनरितीप्रमाणे
विस्मरणाचे
थंड काजळी
उठेल थडगे
केविलवाणे

मी विझल्यावर
त्या राखेवर
पण कवण्या
अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या
कविता माझ्या
धरतील
चंद्रफुलांची छत्री


---बा. भ. बोरकर